पुणे - पावसाळ्यात पुणे महानगरपालिकेच्या नियोजनातील त्रुटी सातत्याने समोर येत असून, पुण्यातील गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी भर पावसात झाडांना टँकरने पाणी घालणं आणि नव्यानं डांबरीकरण केलेला रस्ता खचणं अशा घटनांनंतर आता ही घटना समोर आली आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी याला पुणे महापालिकेच्या बेजबाबदार आणि गलथान कारभाराचं उदाहरण म्हणत, दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासनाने पाण्याची अशी नासाडी होणं अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत, दोन दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेनेच्यावतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.