जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना लालावाच्या प्रस्तावित कारवाईला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तब्बल 14 हजार शेतकरी सभासद असलेल्या या कारखान्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 23 तारखेला लिलाव होणार आहे. हा लिलाव तातडीने रद्द करून कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वर्षानुवर्षे हजारो शेतकऱ्यांच्या उसाला आधार ठरलेला कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याऐवजी त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. हा कारखाना उभारण्यासाठी अनेकांनी स्वतःच्या जमिनी दिल्या. त्यामुळे कारखाना विकण्याऐवजी तो पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, 23 तारखेचा लिलाव थांबवला नाही तर कारखान्यासाठी दिलेल्या जमिनींवर पुन्हा ताबा घेऊन त्या ठिकाणी पेरणी करण्यात येईल. याशिवाय, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि कारखान्याची विक्री झाली, तर आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा गंभीर इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.