बीड - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त बीड येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना थेट बावनकुळेंवर त्यांनी निशाणा साधला. आरक्षण देणारे तुम्हीच आणि रद्द करण्याचा घाट घालणारे तुम्हीच आहात. ओबीसी आरक्षण किंवा प्रमाणपत्र रद्द करा, असं एकतरी पत्र मला दाखवा 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार आहे. मी उगाच आरोप करत नाही. तुम्ही केलेली चूक सुधारा, आम्हाला बोलायची गरज नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मी केलं म्हटलं तर केलंच म्हणतो. मी मराठ्यांशी प्रामाणिक राहणार आहे, नेत्यांशी, मंत्र्यांशी नाही. त्यांनी चुक केली म्हणून बोललो. बावनकुळेंची नाही तर अधिकाऱ्यांच्या नार्को टेस्टची मागणी करावी लागेल. बावनकुळेंच्या नार्को टेस्टचा विषय नाही. त्यांनी फक्त पत्र काढलं तो विषय आहे. तुम्ही रद्द करून बदला घेणार तर आम्ही पाडून बदला घेणार, असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे.