बारामती : श्रावणाच्या सरी अंगावर झेलत असताना कधी ढगाआडून अलगद डोकावणारे ऊन, हिरवाईनं नटलेली पृथ्वी, जलाशयाच्या काठावरचा मंद वारा आणि त्यात ढोल-लेझीमच्या तालावर दुमदुमणारा जयघोष... हे दृश्य एखाद्या चित्रातले नव्हते, तर पिंगोरीच्या मातीत शेकडो वर्षांपासून जिवंत असलेल्या समृद्ध लोकपरंपरेचं आहे. निसर्गाच्या कुशीत एकत्र येऊन भोजन करण्याची, ग्रामदेवतांना साकडं घालण्याची आणि माणसामाणसांतील नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याची ही परंपरा यंदाही पिंगोरीकरांनी तितक्याच श्रद्धेनं जपली आहे. पुरंदर तालुक्यात ‘शिंदे सरदारांचं गाव’ म्हणून ओळख असलेल्या पिंगोरीमध्ये शनिवारी ग्रामदेवता श्री वाघेश्वरी देवी आणि श्री लक्ष्मी मातेच्या पालखीसमवेत ग्रामस्थ जय गणेश जलसागराच्या काठावर वनभोजनासाठी एकत्र आले होते. ही केवळ वनभोजनाची मेजवानी नव्हती, तर भूतकाळाशी नाते जोडणारी, वर्तमानाला दिशा देणारी आणि पुढील पिढीला संस्कृतीचा वारसा सोपवणारी जिवंत लोकपरंपरा होती.